जळगाव : जिल्ह्यात गुलाबी थंडीमुळे हवामानाचा पारा कमालीचा घटला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चढाओढीमुळे राजकारण मात्र तापले आहे. यामागील कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे व भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण अधिक पेट घेताना दिसत आहे. एकमेकांच्या व्यक्तिगत पातळीवर टीका टिपण्णीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे.
राज्याचे ग्रामविकासमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुलाची आत्महत्या की खून? याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांचा समाचार घेत असताना हा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे नीच हलकट प्रवृत्तीचे दर्शन असल्याचे म्हटले आहे आहे. तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर खुशाल चौकशी करा, मी त्यांच्या व्यक्तिगत परिवाराबद्दल आजपर्यंत कधीच बोललेलो नाही त्यांनी घराणेशाहीचा आरोप केला होता म्हणूनच गिरीश महाजन यांच्या पत्नी गेल्या 25 वर्षापासून सत्तेची पदे उपभोगत असल्याचे बोलले होते. मात्र गिरीश महाजन आणि थेट माझ्या स्वर्गवासी मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केल्याने प्रचंड वेदना झाल्याचे खडसेंनी म्हंटले आहे.
खालावलेल्या राजकारणामुळे नागरिकांमध्ये संताप
आता राजकारणातील वार-पलटवार थेट परिवारापर्यंत जाऊ लागल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिग्गज व अनुभवी नेते असताना राजकारणातील मर्यादा बाळगणे गरजेचे आहे. मात्र दोन्ही नेते थेट व्यक्तिगत वार करीत असल्याने खुनशीचे राजकारण सुरू असल्याचे सध्या जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यात सर्वसामान्य जनता देखील भरडली जात असून विकासापासून नागरिक मात्र वंचित आहे. व्यक्तिगत टीकांमधून त्यांना वेळ मिळाला तर त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विकासाकडे लक्ष द्यावे अशी कळकळ नागरिकात बदल व्यक्त होत आहे.