धरणगाव : तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका धार्मिक स्थळाजवळून वणी गडावर पालखी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेत पोलिसासह तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.
या घटनेमध्ये हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 100 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत 45 जणांना अटक केली आहे. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाचीदेखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव व चोपडा येथून पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.
आरसीपी पथक तैनात
घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, ऋषिकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहोचले. पोलिसांनी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक तैनात केले आहे. संशयितांची धरपकड रात्रीच करण्यात आली असून गावात शांतता आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले आहे.