(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) औद्योगिक वसाहत आणि अजिंठा चौफुली चारही बाजूने वेढलेली आहे. या चौफुलीवर नेहमी विविध वाहनांची वर्दळ असते. कारण एक रस्ता अजिंठा, औरंगाबाद याडे जातो, तर दुसरा रस्ता नागपूर ते कलकत्ता पर्यंत. तसेच भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरातमध्ये देखील या मार्गानेच जावे लागते. अशा महत्वपूर्ण या चौफुलीकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे उड्डाणपुलाचे सध्या काम सुरू आहे. परंतु ‘प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या तत्त्वाच्या आधारे ही अजिंठा चौफुली सोडून दुसरीकडे उड्डाण पुल बनवायचे काम हातात घेतले?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. दर मिनिटाला अजिंठा चौफुली येथे किती दुचाकी-चारचाकी मोठे ट्रक रिक्षा बसेस ये-जा करतात त्याचा काही अभ्यास केला आहे का? या चौफुलीवर रोज अपघात किती होतात त्याचा अभ्यास करण्याची गरज होती. मात्र तसे काहीही करण्यात आलेले नाही. वाहनांच्या वर्दळीमुळे चारही बाजूंनी वाहतूक सुरू असते. कधीकधी तर बेशिस्त वाहन धारकांमुळे अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
परंतु हा शहरातील गजबजलेल्या भाग सोडून अग्रवाल चौक आणि त्यापुढचा चौक अशा दोन ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याचा उद्देश न समजण्यासारखा आहे. याठिकाणी खरोखरच उड्डाणपुलाची गरज आहे का? याचा देखील विचार झाला पाहिजे. बनवायचे होते तर कालिंका माता मंदिरापासून थेट दादावाडी पर्यंतचा बनवण्यात आला असता. नाशिक, मुंबईला जाताना नाशिक पार करायला खूप वेळ लागत होता. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची गरज लक्षात घेऊन थेट दहा किलोमीटरचा उड्डाणपूल बनवून कायमची समस्या मोडकळीस काढली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. आपल्याकडे कोणी बोलणारा नाही. राजकारणी लोक मूग गिळून गप्प बसले आहेत. अनेक वेळा अधिकारी या रस्त्याने वापर करतात. त्यांना सर्व माहीत असताना देखील ते गप्प का? असा सवालही नागरिकांनी केला आहे.
अजिंठा रोडवर विमानतळ झाले आहे. कालांतराने विमानाच्या फेर्या वाढते मोठे विमान देखील येतील, वैमानिक ट्रेनिंग सेंटर देखील सुरू होईल, तेव्हा वाहतूक किती वाढेल याचा विचार होणे गरजेचे आहे. या रस्त्याने बड्या लोकांची, व्हीआयपी लोकांचीही ये-जा सुरू राहील. परंतु ही केवळ अजिंठा चौफुलीच राहणार असेल, तर भविष्यात काय होईल? यासाठी अजिंठा चौफुलीवर उड्डाणपुलाची खरी गरज आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नवीन उड्डाण पुलाबाबत शहराचे वास्तुविशारद, जे नावाजलेले आहेत, ज्यांना राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला आहे असे ‘शिरीष बर्वे’ यांनी कित्येक वेळा सांगितले की, ‘अधिकाऱ्यांनी केलेली आराखडा चुकीचा आहे, त्यात बदल होणे आवश्यक आहे.’ परंतु शिरीष बर्वे यांच्या वक्तव्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रशासनातील हे अधिकारी किती निगरगट्ट आहेत हे दिसून येते.