• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील –
पालकमंत्री गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 15, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव – कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.

भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यांची होती उपस्थिती याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकशाही आणखी बळकट करू या.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेकांनी आपले बलीदान दिले आहे. अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच आपण आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

पालकमंत्री पुढे म्हणाले की, मागील काळात आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे आता तो कमी झाला आहे. मात्र, दुसरे संकट आपल्यासमोर निर्माण होवू पाहत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. माझा बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलैत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, ऑगस्टच्या 15 दिवसानंतरही पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे जिल्हावासियांना आवाहन

जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांची चांगल्याप्रकारे पेरणी झाली आहे. त्यासाठी लागणारी खते मुबलक उपलब्ध आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. पीकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने आपण सर्वजण वरूण राजाला साकडे घालू या. याबरोबरच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले.

ई-पीक पाहणी प्रकल्प उपयुक्त
आजपासून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पामुळे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकणार आहे. यामुळे पीक कर्ज, पीक विमा योजना राबविणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे. याबरोबरच महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी बांधवावरील कामाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार आहे. तसेच आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री सुलभीकरणासाठी ई-पीक पाहणी ॲप उपयुक्त ठरणार आहे. पीक माहितीच्या आधारे शासनस्तरावर कृषीविषयक कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होणार असून हवामान, किडींचा प्रादुर्भाव व इतर रोगांवरील उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांना तातडीने संदेश देणे शक्य होणार आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन 21-22 करीता 536 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूमुळे राज्याच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्यामुळे एकूण आराखड्याच्या 60 टक्के निधी उपलब्ध होणार असून या निधीतून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येईल. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. काही प्रकल्प कार्यरत झाले असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णलयात ऑक्सिजन पाईपलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 हजार 461 खाटांचे व्यवस्थापन केले आहे. तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात बालरुग्ण कक्ष सुरु केला आहे. तसेच व्हेन्टीलेटर व आयसीयु खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोगय केंद्रात दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध आहेत. शिवाय 14 लाखापेक्षा अधिक नागरीकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख कोविड लसीचे डोस देण्यात आले आहे. यात आठ लाखापेक्षा अधिक नागरीकांना पहिला तर अडीच लाखापेक्षा अधिक नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पुर्नवसन
कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. काही घरांमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 20 असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 510 एवढी आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. या कुटुंबांना प्राथमिक टप्प्यात अन्नधान्य, किराणा, कपडे, शालेय साहित्य, बि-बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्यांना शासनाची भरीव मदत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. या कालावधीत बांधकाम मजूर, घरेलू कामगार, ॲटोरिक्षा चालकांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने भरीव मदत जाहीर केली होती. त्यानुसार आपल्या जळगाव जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून एकूण 43 हजार 357 नोंदीत कामगारांना 8 कोटी 92 लाख 8 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात जमा केले. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 हजार 723 कामगारांना 40 लाख 84 हजार 500 रुपयांची मदत केली. नोंदीत 1 हजार 628 माथाडी कामगारांना 32 लाख 56 हजार रुपयांची मदत केली. नोंदीत सुरक्षा रक्षकांना 1 हजार रुपये अतिरिक्त वाहन भत्ता मंजूर केला. एकूण 538 सुरक्षा रक्षकांना 5 लाख 38 हजार रुपयांची मदत केली. याबरोबरच जिल्ह्यात 4 हजार 137 ॲटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 याप्रमाणे 62 लाख 5 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे.

मजूरांच्या हाताला काम
त्याचबरोबर लॉकडाऊन काळात नागरीकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 8 लाख 10 हजार 295 मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली असून याकरीता 23 कोटी 27 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यात खावटी योजनेतंर्गत 70 हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत 60 हजार लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले आहे. तर शासकीय आश्रमशाळांमार्फत आदिवासी विद्यार्थी, गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

शासनाच्या विविध योजनांतून मोफत अन्नधान्याचे वाटप
कोरोनाच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना 35 किलो, प्राधान्य कुटूंब योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 5 किलो तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 किलो धान्य मोफत देण्यात आले. तसेच नवसंजीवनी योजनेतंर्गत यावल तालुक्यातील 7 गावांना 4 महिन्याचे धान्य पावसाळ्यापूर्वीच रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील कोणीही गरीब व गरजू अन्नापासून वंचित राहू नये याकरीता जिल्ह्यात 47 शिवभोजन केंद्रामार्फत दररोज 4 हजार 500 थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन योजना सुरु झाल्यापासून आजपावेतो जिल्ह्यात 17 लाख 4 हजार 990 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच विशेष सहाय्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 672 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेतंर्गत 85 कोटी 56 लाख 58 हजार 700 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
जिल्ह्यात वैयक्तीक लाभाच्या योजना गरजुंपर्यंत पोहचविण्यासाठी प्राधान्य देत असतांनाच जिल्ह्यात सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांवर भर देऊन जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. याकरीता जळगाव पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीमार्फत 29 चारचाकी तर 38 दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य
जलजीवन मिशनच्या माध्यमातून 2024 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ठ पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. याकरीता राज्यासाठी 13 हजार कोटींचा तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील 2025 गावांसाठी 3 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल 1200 कोटी रूपयांची तरतूद केली असून स्वच्छता विभागातर्फे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 314 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे जिल्हावासियांना आवाहन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव आत्मनिर्भर झाले असून यापुढील काळात जळगाव जिल्ह्यातून कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी माझ्यासह सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा कटिबध्द आहेतच. मात्र, यासाठी राज्य शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्हावासीयांनीही प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यांचा झाला सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन 2019-2020) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्था यांना प्रदान केला.
पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह – सहाय्यक फौजदार शिवाजी राजाराम पाटील, सहाय्यक फौजदार लिलाकांत पुंडलिक महाले, जिल्हा विशेष शाखा, जळगाव, पोलीस हवालदार विजय माधव काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव, पोलीस हवालदार शशिकांत बाबुलाल पाटील, जिल्हा विशेष शाखा, जळगाव. पोलीस हवालदार सुनिल पंडीत दामोदरे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोलीस नाईक महेश रामराव पाटील, पारोळा पोलीस स्टेशन, पोलीस नाईक संदीप श्रावण सावळे, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव.
पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक – पोलिस शिपाई अतुल अंगद मोरे, पोलीस मुख्यालय, जळगाव.
महा आवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था/व्यक्ती – उत्कृष्ट क्लस्टर रामजीपाडा, ग्रामपंचायत, अडावद, ता. चोपडा.
प्रधानमंत्री आवास योजना जिल्हास्तरीय पुरस्कार- सर्वोत्कृष्ठ तालुका- प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, व्दीतीय क्रमांक भुसावळ, तृतीय क्रमांक चाळीसगाव.
राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ठ तालुका प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, द्वीतीय क्रमांक एरंडोल, तृतीय क्रमांक बोदवड
कृषि विभाग – श्री किशोर संभाजीराव साळुंखे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एरंडोल. श्री. तुफान तुकाराम खोत, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव. श्रीमती वैशाली रंगराव पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भडगाव. श्री. पांडूरंग बाबुराव महाजन, कृषी पर्यवेक्षक, तालुका फळरोप वाटीका, पाचोरा, श्री तुळशीराम रामदास पवार, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव, श्री. अमोर शिवदास पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जामनेर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजारोहण करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होंशिग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: coronajalgaonjalgaon jilhapalakmantri gulabrao patilshetkari
Previous Post

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Next Post

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Next Post

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!