जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व अयोध्या नगर मित्रपरिवार यांच्या तर्फे देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आजी माजी सैनिक व पोलीस यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. सैनिक व पोलीस यांच्यामुळे ते अबाधित आहे. याच भावनेतुन आजी माजी सैनिक व पोलीस यांचा पुष्पगुच्छ व राष्ट्रपुरुषांचे चित्र, माहिती असलेल्या वह्या देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सैनिकांच्या हस्ते २५१ फूट लांब तिरंगा ध्वजयात्रेची सुरुवात करण्यात आली. समस्त अयोध्या नगर परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढुन व पुष्पवृष्टी करून तिरंगा ध्वज यात्रेचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी रक्तदान देखील केले. तसेच आयोजकांतर्फे गरजु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यात सैनिकांनी देखील सत्कार करतांना मिळालेल्या वह्या गरजूंना दिल्या. देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत महामंत्री ललीत चौधरी, माजी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेवक डॉ. विरण खडके, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, दिपककुमार गुप्ता, हर्षल मावळे, सुनील सरोदे, ललित कोळी आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेचे जिल्हा संघटक लतेश चौधरी, चैतन्य कोल्हे, ललित चौधरी, केतन महाजन, कुणाल सोनार, अनिकेत मराठे व अयोध्या नगर मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला खान्देशी रक्षक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक संदिप सुरळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. खेमराज पाटिल यांनी केले तर आभारप्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले.