मुंबई राजमुद्रा दर्पण । गोव्याचे राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच कोव्हिड काळात गोवा भाजप सरकारने मोठा झोल केल्याचा आरोप मलिक यांनी केला. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र कमी व्हायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी केला होता. गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असून यासंदर्भात आवाज उठविल्यामुळेच मला तेथून हटविण्यात आले, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
गोवा सरकारने राबविलेली ‘घर-घर रेशन’ ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ती राबवली गेली, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात गोव्यातील भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले, असा ठपका मलिक यांनी ठेवला आहे. भाजपची मंडळी मलिक यांचे हे आरोप फेटाळणार, हे तर उघड आहे. परंतु गोव्याबाबत त्यांनी जी विधाने केली आहेत, त्याबाबत शंका उपस्थित होण्याचे काहीच कारण नाही. कारण विद्यमान भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था सर्वच क्षेत्रांत केविलवाणी झाली आहे.
कोरोनाची परिस्थिती या सरकारने नीट हाताळली नाही हे तर आहेच, पण तेथील आरोग्य यंत्रणा साफ कोसळून पडली आहे. कोरोनामुळे गोव्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावरच कुऱ्हाड पडली. त्यामुळे राज्याचे अर्थकारण जसे बिघडले तसे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या चुली थंडावल्या. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अमली पदार्थांचा गोव्याभोवती पडलेला विळखा कमी होण्याऐवजी घट्टच होत चालला आहे. गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे.
तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ नावाचा एक पडेल प्रयोगही त्यांनी मध्यंतरी करून पाहिला. त्यामुळे गोव्याचे वास्तव झाकले जाईल, असे त्यांना वाटले असावे. वास्तविक भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे.