राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – ज्ञानवापी संकुलात श्रीगौरीची पूजा करण्याची मागणी करणारी हिंदू पक्षाची याचिका वाराणसी जिल्हा न्यायालयाने कायम ठेवण्यायोग्य असल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीस योग्य असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले. कोर्टात मुस्लिम बाजूने १९९१ च्या प्रार्थना स्थळ कायद्यांतर्गत दावा फेटाळण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले की, हिंदू बाजूने कोणत्याही नवीन बांधकामाबाबत बोललेले नाही, परंतु यथास्थिती कायम ठेवून पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे. हिंदू बाजूच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या प्रकरणात १९९१ चा प्रार्थनास्थळ कायदा लागू होणार नाही.
आता हा खटला चालवण्यास न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आता आमच्या बाजूने मशिदीच्या जागेची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली जाईल, असे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. हिंदू बाजूच्या वकिलांनी सांगितले की १९९१ चा पूजा कायदा आमच्या बाजूने आहे कारण आम्हाला असे म्हणायचे आहे की १५ ऑगस्ट १९४७ रोजी या ठिकाणाचे धार्मिक स्वरूप हिंदू मंदिराचे होते. याचाच आधार घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सांगितले आहे. कोर्टाने पुढील सुनावणीसाठी २२ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार असेल.
न्यायालयाचा हा निर्णय ज्ञानवापी संकुलातील शृंगार गौरी पूजनाच्या अर्जाच्या सुनावणीबाबत आहे. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या प्रकरणाचे याचिकाकर्ते सोहनलाल आर्य म्हणाले, ‘हा हिंदू समाजाचा विजय आहे. २२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ते ज्ञानवापी मंदिराच्या पायाभरणीसारखे आहे. आम्ही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. दरम्यान, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे आमचे काम आहे.