पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा सुरु आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर. औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी 6 गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण 6 गुण देण्यात येणार आहेत.
‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण
या विषयावर बोर्डाने सांगितलं की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपरमधील चुकीचे तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत.
‘या’ परिस्थितीमध्येच विद्यार्थ्यांना मिळणार गुण
1. उत्तरपत्रिकेमध्ये Poetry Section-2/ Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास
2. विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर
3. त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास
वरील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिले असल्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे विद्यार्थ्याला एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.