मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर आक्रमकपणे टीका करीत आहे. आता त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ‘नपुसंक’ या शब्दात केलेल्या भाष्यमुळे सरकारचे धिंडवडे निघाले असल्याचे परखड मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षात उपेक्षा केली जात असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे. अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यासारख्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये अपमान सहन करावा लागला. त्यांना त्रास देण्यात आला. अलीकडच्या काळात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचीही छळवणूक करण्यात आली. आतापर्यंत पंकजा ताईंना भाजपने अपमानास्पद वागणुक दिल्याचे खडसे म्हणाले.
भाजपला ओबीसी चेहऱ्याची गरज….
मात्र आता निवडणुकांमध्ये प्रभावी ओबीसी चेहरा हवा म्हणून पंकजा मुंडे यांना मतासाठी पुढे करण्यात येऊ शकते अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. त्या सक्षम ओबीसी नेत्या, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत आणि त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग राज्यात आहे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे ‘त्यांना’ ओबीसी चेहरा पाहिजे, पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे.
पहाटेचे चार आणि पक्षत्यागाचा विचार
गोपीनाथ मुंडे आणि मी 30-35 वर्षे एकत्र काम केलं. त्यावेळी मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला आमच्यामुळे सर्वसामान्यांच्या पक्ष म्हणून ओळख मिळाली. पूर्वी भाजपमध्ये ओबीसींना घेत सुद्धा नव्हते. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने किती त्रास दिला हे मला माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यास भाग पाडलं. मध्यंतरी त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा आला होता, असे गौप्यस्फोट त्यांनी या चर्चेत केले.