(जळगाव, राजमुद्रा) शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरात गेल्या १२ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी हाहाकार माजला होता. यासंदर्भात मनपाचे पाणी पुरवठा अभियंता भांडारकर यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही उपाययोजना झाली नाही. शेवटी भाजप युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव यांनी आमदार राजूमामा भोळे आणि स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील तथा अमित साळुंखे यांच्याशी या संदर्भात तक्रार केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार राजूमामा भोळे व राजेंद्र घुगे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून तत्काळ पाणी पुरावठा करण्यासंदर्भात आदेश दिले असता सायंकाळी साडेपाच वाजता पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या बारा दिवसांपासून सुप्रीम कॉलनी परिसरात इतकी बिकट परीस्थित होती की नागरिकांना पाण्याचे जार विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत होती.
बारा दिवसांनी पाणीपुरवठा झाल्या संदर्भात रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडत आमदार भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे आणि अमित साळुंखे यांचे आभार मानले. दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवासी व भाजप युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा महानगर सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.