राजमुद्रा : राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेतील कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने कठोर निर्णय घेतला आहे. कॉपी प्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी जीपीएसद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वर करडी नजर असणार आहे.
. राज्यातील 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यातील 3 हजार 373 केंद्र तयार करण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. बारावीची परीक्षा ही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी कोणत्या परीक्षा केंद्रावर कधीही धाड टाकू शकतात. या धाडीत एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी आता बोर्ड सज्ज झाले असून परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार आहे. यानंतरही परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.