जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ती सकाळची वेळ होती… सर्वत्र धावपळ सुरू असताना अचानक त्या महिलेला औद्योगिक वसाहती मधील कंपनीत तातडीने जाणे आवश्यक होते… ती आपल्या दुचाकीने निघाली खरी, मात्र अचानक.. काही तांत्रिक दोषामुळे तीची दुचाकी त्या चौकात बंद पडली… थोड्याच वेळात त्या परिसरात असंख्य वाहनांची लगबग सुरू झाली… आणि चारही दिशेने येणारी वाहने तिला महापुरात अडकल्याचा थरार अनुभवून गेली.. त्या महिलेची अवस्था बिकट झाली होती.. आधीच गाडी बंद पडलेली, त्यात तिच्या अंगावर येणारी वाहनांची गर्दी.. काय करावे अन, काय करू नये अशा अवस्थेत तिने आपली दुचाकी कशीबशी ढकलत पुढे नेली.. या सर्व गर्दी गोंधळात तिच्या मदतीला साधा वाहतूक पोलीस देखील तिथे नव्हता हे तिचे दुर्दैव होते.. ही घटना आहे अजिंठा चौक परिसरातील..
शहरातील गजबजलेला परिसर म्हणजे अजिंठा चौफुली होय. या ठिकाणी सध्या बेशिस्त रहदारी वाढली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांना बसत आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या चौपदरीकरणात उड्डाणपूल करण्याच्या यादीतून नेमका अजिंठा चौक वगळण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात केवळ दादा वाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक आणि अग्रवाल चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. परंतु सर्वात जास्त आवश्यकता ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. अजिंठा चौफुलीवर उड्डाणपूल बनवण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान त्या ठिकाणी एक सर्कल तयार केले जाणार आहे. मात्र हे सर्कल अडचणीचे ठरू शकते, असा दावा अनेकांनी केला आहे.
अजिंठा चौक परिसरात सर्कल ऐवजी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल उभारला जावा अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. कारण शहरातून या मार्गाने मोठ्या संख्येने वाहतूक होत असते. हजारो ट्रक, कार, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर आदी वाहनांची ये-जा सुरू असते. कित्येक वेळा या परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली आहे. लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. छोटे-मोठे अपघात ही तर नित्याची बाब झालेली आहे. यात महामार्गावरून शाळकरी आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची नेहमी गर्दी असते.
शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्र या परिसरात जवळ असल्या कारणाने दिवसभर या मार्गावरून वाहतूक सुरू असते. याचा विचार नही (NHAI) अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. या भागात उड्डाणपुलाची खरी गरज आहे. ती ओळखून तातडीने त्या कामाची सुरुवात व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. याठिकाणी मोठा सर्कल झाल्यास अनेक अडचणी येणार आहेत. शहरातील विस्तारित भाग, औद्योगिक वसाहत, विमानतळाकडे जाण्यासाठी हा चौक ओलांडावा लागतो. त्यामुळे भविष्यातील वाढती रहदारी लक्षात घेता या भागात उड्डाणपुलाची खरी गरज आहे, असा दावा ‘जिल्हा मोटर ओनर्स ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनने’ केला आहे.
अजिंठा चौक लगत अनेक कॉलन्या आहेत. त्यात प्रामुख्याने सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, गणेश पुरी, आयोध्यानगर, कालंका माता परिसर यासह अनेक लहान मोठ्या कॉलन्यांमध्ये दिवसेंदिवस रहिवास वाढत आहे. त्यांना हा चौक ओलांडून जावे लागते, याचा विचार देखील करणे गरजेचे आहे. या चौकात उड्डाणपूल व्हावेत यासाठी अनेकांनी आंदोलने केली, रास्ता रोको केला, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. परंतु आतापर्यंत केवळ आश्वासन मिळाले असून प्रत्यक्ष कृती मात्र झालेली नाही. काही तज्ञ मंडळींनी देखील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘या मार्गावर उड्डाणपूल का आवश्यक आहे’ याबाबत चर्चा देखील केली. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. आता जागरूक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.