मुंबई राजमुद्रा दर्पण । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंचरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधील आरोपीकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधींची जमीन केवळ 20 लाखांत विकत घेतली, ती कशी? आणि मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असे सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्याचवेळी उपस्थित पत्रकाराने फडणवीसांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारला.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन अगदी कवडीमोल भावात घेतली. मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या अंडरवर्ल्ड आरोपींकडून मलिकांनी जमीन कशी काय घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच आणखी 4 व्यवहार देखील मलिकांनी अंडरवर्ल्डशी केलेत, असा खळबजनक दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुर्ला येथे तीन एक जमीन 1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची नोंदणीनोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे. 2019 पर्यंत नवाब मलिकही सॉलिडसमध्ये भागीदार होते. मात्र, मंत्री होणार असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांशी व्यवहार केला. सलीम पटेल आणि सरदार शहा वली यांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवून शिक्षा होणार याची चाहूल लागल्यानंतर ही जमीन कमी भावात मलिक यांना विकण्यात आली” अ्सा दावा फडणवीस यांनी केला.