नाशिक राजमुद्रा दर्पण । राजकीय वाद, एकमेकांवर टीका-टिप्पणी असं चित्र आपल्याला राज्यात नेहमी पाहायला मिळतं. मात्र, राजकारणापलिकडे जात वेगवेगल्या पक्षातील लोक आपलै व्यक्तिगत संबंध जोपासतानाही दिसून येतात. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातही कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी वैयक्तिक टीका पाहायला मिळाली. दुसरीकडे भुजबळ आणि राऊतांमध्येही खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही दिसून आल्या. निमित्त होतं भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर जोरदार टोलेबाजी केली. तर चंद्रकात पाटील यांनी यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुनही संजय राऊत यांनी आज चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
या टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहिले. यावेळी भुजबळ, पाटील आणि राऊत एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत आणि मधे भुजबळ बसले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या.