जळगाव : जळगाव शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.११) माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबद नाराजी व्यक्त केली. याच बरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.
याप्रसंगी त्यांच्या सोबत महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मिळालेल्या निधीतून वर्ष झाले तरी अद्याप कामे पूर्ण झालेली नाही. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव बदलण्याचा शब्द दिला होता. परंतु तसे काही झाले नाही. आताचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कामाकडे लक्ष देत नाहीत. अश्यावेळी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोमणा आ.खडसेंनी लगावला आहे. याच बरोबर सुरेश जैन यांच्या विरोधात मी संघर्ष केला. मात्र त्यांच्या काळात काम निकृष्ट होत नव्हतं. आज होणारी काम निकृष्ट आहेत.
विधानपरिषदेत प्रश्न मांडणार
शहरात एकही रास्ता नाही ज्यावर खड्डा नाही. नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील रस्त्यांसाठी एक वर्षाच्या आधी वर्क ऑर्डर मिळाली असली तरी आज कामे होत आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून यात डांबर न वापरता काम होत असल्याचा गंभीर आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला. या प्रकरणी आपण विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करणार असून राष्ट्रवादीतर्फे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.