मुंबई : मंत्रालयात शिपायाकडूनच बोगस लिपिक पदाच्या भरतीच्या नावाने प्रत्येकी 6 ते 10 लाख रुपये उकळून फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 जणांनी 60 लाखांहून अधिक रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या तरुणांची मंत्रालयातच मुलाखती झाल्या होत्या. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष 6 कडून सुरू आहे. महेंद्र नारायण सकपाळ, महादेव शेदु शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक साठे अशी चौकडींची नावे आहेत. मालाडमधील रहिवासी असलेल्या सागर जाधव (वय 26) यांनी 24 मे रोजी याबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्याची वडिलांच्या मित्रामार्फत सकपाळसोबत ओळख झाली.
पोस्टिंगच्या लेटरसहीत दिली कागदपत्रे
सकपाळने नितीन साठे याच्या ओळखीने पैसे देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांनी पैसे जमविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 3 भावंडांचे 9 लाख रुपये आणि कागदपत्रे दिली. त्यानंतर सकपाळने वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेले. तेथे पोस्टिंगच्या लेटरसहीत रीतसर पेपर काढलेले दाखवत डीनची स्वाक्षरीही घेतली.
दहा जणांची पोलिसांत धाव
पुढे, ऑगस्ट महिन्यात अर्धे काम झाल्याचे सांगून उर्वरित आणखी 6 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. जुलैमध्ये पुन्हा सचिन डोळसने आणखी 2 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. याचदरम्यान आणखी काही मुलांचे पैसे घेतल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे समजताच दहा जणांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी दुजोरा देत तपास सुरू असल्याचे सांगितले.