पंढरपूर : पंढरपूर येथे माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या भाविकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक भाविकांची प्रकृती खराब झाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 1 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे तब्बल 4 लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरचा माघवारी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते. माघ वारीचा सोहळा आनंदी वातावरणात भाविक साजरा करीत असतानाच तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना घडली आहे.
पहाटेच्या सुमारास अचानक त्रास
पंढरपूर शहरातील एका दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भाविकांनी एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे बुधवारी 1 फेब्रुवारीला भगर आणि आमटी खाल्ल्याची माहीती मिळत आहे. त्यानंतर आज (ता. 2 फेब्रुवारी) पहाटे 3-4 वाजेच्या जवळपास भाविकांना मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.