मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्यास विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात झालेल्या परीक्षांच्या अनेक नियमात यंदा बदल करण्यात आला आहे. सोबतच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय बदल करण्यात आले?
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी काही सूट देण्यात आली होती. मात्र आता या नियमात मंडळाने बदल करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
– शाळा तेथे केंद्र पद्धत बंद करण्यात आली आहे.
– 25 टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.
– उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देखील रद्द करण्यात आला आहे.
– परीक्षेत यंदा बैठेपथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.
– शिक्षण मंडळाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचं विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, एवढेच नाही तर पाच वर्षांसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.
अशा प्रकारांवर होणार कारवाई
– मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
– परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
– मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
– उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक, अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक, फोन नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.
– परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे अशा गैरप्रकारांवर कारवाई केली जाणार आहे.