जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या पाचही नगरसेवकांना बरखास्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी न्यायालयात अर्ज केला आहे. पाचही नगरसेवक दोषी असल्याने अपात्र करण्याबारोबर दाव्याचा निर्णय लवकर लागावा म्हणून सुनावणी रोज घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
घरकुल घोटाळा प्रकरणात भाजपचे विद्यमान नगरसेवक कैलास सोनावणे, गटनेते भागात बालानी, सदशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे हे दोषी ठरले असून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्या नंतरही पाचही नगरसेवक पालिकेच्या कामकाजात सहभागी होत राहिले. त्यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर करून ठरावाची आयुक्तांनी अंमलबजावणी करावी असा निर्णय घेण्यात आला. याकडे सर्व नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.