(राजमुद्रा वृत्तसेवा) केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. थावरचंद गहलोत यांची कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती. नुकताच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला असून अनेकांची खाती बदलण्यात आली आहेत.
१९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत असणार आहे. पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच खाद्य आणि आपूर्ती मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर टेक्स्टाइल मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे.
मोदी सरकारमध्ये यापूर्वी राज्यसभेचं सभागृह नेतेपद अरुण जेटली यांच्याकडे होतं. त्यांचं निधन झाल्यानंतर ही जबाबदारी थावरचंद गहलोत यांच्याकडे आली. आता या पदावर पियुष गोयल यांची वर्णी लागली आहे. संसदीय राजकारणात पियुष गोयल यांना देण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. पियुष गोयल २०१० पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचे विरोधकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं राजकीय बोललं जात आहे.