(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) अनेक पाणीपुरवठा योजना या क्षेत्रीय स्तरावर करण्यासारख्या आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात तसेच रखडलेल्या तसेच नव्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना तसेच विभागातील नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
‘सविस्तर प्रकल्प अहवाल गतीने तयार करावेत, प्रत्येक तालुक्यात दररोज, दर महिन्याला किती नळजोडण्या करणार, पुनर्जोडणी करणार याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे नियोजन करावे. काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना नियोजन करून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. दर महिन्याला विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्याचा आढावा घ्यावा,’ असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.