मुंबई राजमुद्रा दर्पण। नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण 7 ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त होते. दरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. परंतु वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाहीत. जी छापेमारी सुरू आहे ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट वर आहे. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शीपणे सुरू असून, अफवा पसरवणे बंद करा असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी ‘चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा’ म्हणत मलिक यांनी भाजपाला देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र वक्फ बोर्डाच्या कुठल्याही कार्यालयावर छापे पडले नाहीत. अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मी ईडीला कुठल्याही चौकशीत सहकार्य करायला तयार आहे. याउलट भाजपाच्याच एका नेत्याने मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.