मुंबई राजमुद्रा दर्पण । नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली. त्यात एनसीबीचा कोणताही अधिकारी घरी आला नाही. त्या मुलाला घरातून बोलावण्यात आलं. खोटा गुन्हा तयार करून त्याला अटक केली गेली. ज्या मुलाला फसवलं त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहे. शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून त्याला अटक केली, असं मलिक म्हणाले.
वानखेडेंच्या दाखल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली आहेत. शाळेच्या दाखल्यापासून सर्व गोष्टी बाहेर काढल्या. कोर्टासमोर ठेवल्या. सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत. दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर मी ट्विट करावं की नाही, पत्रकार परिषदा घ्याव्या की नाही यावर कोर्ट निर्णय देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या वडिलांने आमच्या विरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे. मला ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.
खोटी कागदपत्रं दाखवू नका. त्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे. त्यांनी 1993मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली. रजिस्टर गहाळ केलं. पण हे सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत. खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं.