मुंबई राजमुद्रा दर्पण। “कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
अमरावतीसारख्या घटनांचे राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. आपण पाहिले असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढे सगळे समान आहेत.
अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणाने पेटवली? हे देशालाही माहिती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहित आहे. वातावरण सगळे शांत झाले असताना, उगाचेच काड्या करणारे काम कोणीही करू नये, एवढेच मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करेल. असे संजय राउत म्हणाले.पुढे बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणे, म्हणजे, हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, ते कुणीही असू द्या. ते एकाच पक्षाचे आहेत, म्हणजे, ते हिंदू किंवा मुस्लिम आहेत, असे होत नाही.” अशी प्रतिक्रिया संजय राउतांनी दिली.