नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण। एनपीए खात्यांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे बँकांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आता एनपीए खात्याची संख्या नियंत्रीत करून, मुदतीच्या आत कर्ज वसुलीसाठी बँकांकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. वेळेत कर्जफेड न करणाऱ्या जवळपास 285 कंपन्यांना गेल्या सहा महिन्यांमध्ये देशभरातील विविध बँकांनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी केले आहे. तसेच त्यांच्या संपत्तीवर जप्ती देखील आणण्यात आली आहे. कर्जफेड न करणाऱ्या कंपन्यांच्या संपत्तीचा लिलाव करून बँका आता आपले कर्ज वसूल करत आहेत.
दरम्यान सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये कर्ज न भरणाऱ्या 144 कंपन्या समोर आल्या आहेत. कोरोना काळात कर्जाच्या वसुलीसाठी कोणत्याही कंपन्यांवर दबाव टाकू नये, तसेच थकबाकीदार कंपन्यांचा समावेश दिवाळखोरीच्या प्रक्रियेत करू नये, असे आदेश सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र कोरोनाचे सावट काही प्रमाणात दूर होताच हे आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बँकांनी आपल्या वसुली मोहिमेला प्रारंभ केला आहे. दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. उत्पादन बंद असल्याने कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न कंपन्यांसमोर होता.