राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोना काळात मोठ्या संख्येने रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला. यामुळे देशात असंख्य मुलं अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, अशा मुलांच्या भरण-पोषणाची आणि त्यांच्या भवितव्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून लावली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अनाथ झालेल्या मुलांना सोयीचा ठरणार आहे.
कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा निश्चित अशी रक्कम (स्टायपेंड) दिली जाईल. त्यासोबतच त्यांनी वयाची २३ वर्षे पूर्ण केल्यानंतर १० लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.
अशा मुलांच्या शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. त्यासोबतच, उच्च शिक्षणासाठी या मुलांना शिक्षण कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जाचं व्याज हे पीएम केअर फंडातून चुकवलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शून्य टक्के व्याजदराने हे शिक्षण कर्ज उपलब्ध होईल. शिक्षण आणि आर्थिक मदतीसोबतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत या मुलांचा ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील काढला जाईल. १८ वर्षांपर्यंत या मुलांना या विम्याचं संरक्षण राहील. या विम्याचे हफ्ते केंद्र सरकारकडून भरले जाणार आहेत.