नागपूर राजमुद्रा दर्पण। ईडी, सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो की शिवसेना, विविध सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या मित्रपक्षांना त्रास दिला जात आहे.’
शरद पवार म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्या पत्नीला ईडीने बोलावले. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. हे लोक शिवसेनेचे संजय राऊत यांच्या विरोधात काहीही करू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीला बोलावून, जबाब घेतला आणि त्यांना त्रास दिला. अजितदादांच्या विरोधात काहीही करता न आल्याने राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक समाज मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही छापे टाकण्यात आले, मात्र काहीही सापडले नाही. अशी किती उदाहरणे सांगू, त्यांना महाराष्ट्र सरकार हातातून गेले हे सहन होत नाही.
पवार हे तुरुंगात असणाऱ्यांना अनिल देशमुखांना पाठिंबा देत पुढे म्हणाले, ‘मी हे सांगतोय, तुम्ही कितीही छापे टाकले, कितीही अटक केली तरी आम्हाला सामान्यांना सोबत घेऊन तुम्ही महाराष्ट्रात कधीच जिंकणार नाही. तुम्हाला शंभर टक्के पराभवाला सामोरे जावे लागेल. तुम्ही अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल.
पवार पुढे म्हणाले की, ‘देशात सूडाचे राजकारण केले जात आहे. सत्तेचा वापर सन्मानासह करावा लागतो. मात्र या लोकांचे पाय जमिनीवर नाहीत आणि सत्ता डोक्यात गेली आहे. हे जे काही होत आहे त्याचा परिणाम आहे.’